शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाल्यास दुप्पट भरपाई मिळणार -सुधीर मुनगंटीवार

कृषी लक्ष्मी | 30 डिसेंबर २०२२ | अनेकदा शेतात काम करत असताना शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. यामुळे आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीच्या नुकसानीची भरपाई दुप्पट करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. गेल्या वर्षात नुकसानीचा आकडा जास्त आहे.

रानडुक्कर, हरिण, वानर यासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसतो. अनेकदा अंतिम टप्प्यात असलेले पीक प्राण्यांकडून फस्त केले जाते.

तसेच नुकसान टाळण्यासाठी वनक्षेत्रातील किंवा वनक्षेत्रालगत असलेल्या गावांना अंशतः कुंपण घालण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानव संघर्ष टाळता येईल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात हत्तींच्या अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात भरपाईसाठी विशेष शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. अशी माहितीही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.