गो संवर्धन आयोग स्थापन करावा-गो संवर्ध महासंघ

कृषी लक्ष्मी | १७ नोव्हेंबर २०२२ | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गो संवर्धन आयोग स्थापन करावा, या मागणीचे निवेदन गो संवर्ध महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटनेतर्फे कोल्हापूरचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन खर्च वाढत असल्याने आर्थिक अडचणीत आहे, तसेच तो आत्महत्या करत आहे. वास्तविक कृषिप्रधान भारत देशाची गेली हजारो वर्षे शेती, चिकित्सा आणि पर्यावरण याचा समतोल राखण्याचे रसायन भारतीय देशी गो वंशात आहे. गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाजी गरज आहे. अशी भूमिका संघटनेने या वेळी मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतप्रमुख (गो सेवा समिती) शेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकांत कुलकर्णी, गो सेवा समितीचे विठ्ठल मुरकेवार, अनिल जरग, अशोक पोतनीस, कपिल उमराणीकर, संजय चव्हाण, गो संवर्धन महासंघाचे अध्यक्ष विजय वरुडकर, आत्मसाहाय्य सामाजिक संस्थेच्या दीप्ती कदम, ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या सारिका नरवाडे, अमृता जगताप, अल्का लुंगारे आदी उपस्थित होते.