कापसाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

कृषी लक्ष्मी । २ जानेवारी २०२३ । गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत होते. कापूस दरात दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली होती. दर कमी झाल्यानं कापसाची विक्री ही 7 हजार 500 पर्यंत खाली आल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठं निराशेचं वातावरण पसरलं होतं. जागतिक पातळीवर कापूस दरात घट झाल्याने हे दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र,आज पुन्हा कापूस दरात प्रतिक्विंटल पाचशे ते हजार रुपयांची वाढ झाल्याने हे दर 8 हजार ते 8 हजार 500 असे झाले आहेत. त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर कापूस दरात वाढ झाल्यानं हे दर वाढले असल्याचं सांगितले जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख गाठी म्हणजेच 51 हजार टन कापूस आयात (Cotton Import) करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन लाख गाठी कापसाची विनाशुल्क आयात करण्यात येणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत विविध शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कापूस आयातीवर लागू करण्यात आलेलं 11 टक्के शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातले परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या विदेश व्यापार संचालनालयानं प्रसिद्ध केलं आहे. 2022 च्या आयातीचा विचार केला तर यावर्षी आयातीत मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतातून कापूस किंवा रुई, सुताची निर्यात ठप्प आहे. अशातच परदेशातून भारतात कापूस आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.